। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । नगर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे उद्या शनिवार (दि.26) करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी पाणी उपसा बंद राहणार असून, परिणामी, शनिवारी, रविवारी व सोमवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
शहरी भागामध्ये काही ठिकाणी व उपनगरात या काळात पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे. या दुरुस्तीच्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
शनिवारी 26 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग-दुरूस्ती कामासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. तसेच या वेळेत अहमदनगर महापालिकेमाफत राबविण्यात येत असलेल्या ’अमृत’ पाणीपुरवठा योजनेची महत्वाची कामे व शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
त्यामुळे या काळात वीज पुरवठा बंद राहणार असल्याने मुळा धरण व विळद जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाण्याचा उपसा होणार नाही व शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकूंदनगर तसेच सारसनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास आणि सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. हा पाणीपुरवठा हा रविवारी दि.27 रोजी करण्यात येणार आहे.
तसेच रविवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहरातील सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
या भागास सोमवारी दि.28 रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल व सोमवारी पाणीपुरवठा असणार्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल
चौकी, माळीवाडा, कोठी या भागात तसेच गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणीपुरवठा मंगळवारी 1 मार्च रोजी करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेे आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याने नागरिकांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
Tags:
Breaking