वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी निंबळक बायपास चौकात गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी

अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन  करण्याचा निंबळक, इसळक ग्रामस्थांचा इशारा

 

। अहमदनगर  ।  दि.11  फेब्रुवारी ।  बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक बायपास चौक शिंदे वस्ती येथे वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी त्वरीत गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी निंबळक व इसळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.


या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिक्षक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी सरपंच विलास लामखडे, सिताराम सकट, समीर पटेल, बाळासाहेब ढवळे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अशोक पवार, भाऊराव शिंदे, बाबासाहेब पगारे, श्रीकांत शिंदे, राजाराम घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


मौजे निंबळक (ता. नगर) बायपास चौक येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. तर सदरील रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर काही अपघातामध्ये अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

 

या चौकात वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी निंबळक व इसळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post