। अहमदनगर । दि.16 मे । लोकयुक्त कायद्यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले असून आज त्यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. एकतर लोकयुक्त कायदा करा नाहीतर सरकारमधून पायउतार व्हा, असे खडेबोल अण्णा हजारेंनी राज्य सरकारला सुनावले.
अडीच वर्षांपूर्वी आश्वासन दिल्यानंतर देखील लोकयुक्त कायद्याबाबत काहीच झाले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आंदोलनाचा जाहीर इशारा दिला. माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्ता कार्यकाळात आश्वासन दिले होते.
फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने लेखी आश्वासन दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या.
आता दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाहीत. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांत आमची कमिटी तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली.
Tags:
Maharashtra