मंत्री बोलतील...:खासदार संभाजीराजे छत्रपती
। कोल्हापूर । दि.11 जून । मराठा आरक्षण प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असे म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून राजर्षी शाहू छत्रपती यांच्या समधीस्थळापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे सांगून, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. हे मूक आंदोलन राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आतापर्यंत समाज खूप बोलला, पण आता आपण नाही बोलायचं.
आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँगमार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
