एमपीएससी परीक्षा २१ मार्चला घेण्याच्या निर्णयाचे अहमदनगर काँग्रेसकडून स्वागत

। अहमदनगर । दि.14 मार्च । एमपीएससीने अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने काल या संदर्भामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला होता. 
 

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेत सरकारला या निर्णयाबद्दल फेरविचार करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत हा निर्णय बदलावा या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. 
 

काँग्रेसच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून २१ तारखेला परीक्षा घेण्यात येतील असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी स्वागत केले आहे. 


काळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही संभ्रमात न राहता तयारीसाठी मिळालेल्या अधिकच्या दिवसांचा सुयोग्य नियोजन करत चांगला अभ्यास करावा आणि परीक्षांना सकारात्मक वातावरणामध्ये सामोरे जावे. 
 

विद्यार्थी नेते उत्कर्ष झावरे म्हणाले की, विद्यार्थी काँग्रेस ही विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरत असते. स्पर्धा परीक्षार्थींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. जाहिद शेख म्हणाले की, स्पर्धा परीक्षार्थींनी परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. प्रशांत जाधव यांनी आवाहन केले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून स्वतःची काळजी घेत परीक्षेला सामोरे जावे.

Post a Comment

Previous Post Next Post