। अहमदनगर । दि.20 मार्च । नगर शहरासह व जिल्हयात शनिवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच नगर तालुका आणि शेवगांव तालुक्यातील कोरडगाव, साकेगाव आदी ठिकाणी गारांचा पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलले आहे.
सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दुपारी आणि रात्री मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाने शहरात चांगलाच तडाखा दिला. ग्रामीण भागातही झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातही काल अवकाळी पावसाने थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह इथे जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाल्याने वृत्त आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्याच्या नगर तालुका, शेवगांव आदी ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे बोधेगाव व आणि पंचक्रोशीत शनिवार वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. पर्जंन्य वृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला आहे. क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.
सगळीकडे पाणीच पाणी झाले. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला खरा परंतु बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्यामुळे आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्यामुळे बळीराजा अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे.

