। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे दर वावरंवार वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक हाल होत आहे. या दरवाढीमुळे नागरीक चांगलेच त्रस्त झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी दिल्लीगेट परिसरात शेणाच्या गोवर्यावर स्वयंपाक करुन आंदोलन केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युवती शहराध्यक्ष अंजली आव्हाड, शितल गायकवाड, अपर्णा पालवे, सुनंदा कांबळे, वैशाली गुंड, सुनिता पाचारणे, किरण कटारिया, सायेरा शेख, उषा सोनटक्के, लता गायकवाड, शीतल राऊत, प्रीती संचेती, वैशाली भापकर, शोभा तांदळे, अर्चना केदारी, अलिशा गर्जे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व सामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल झाले आहेत, त्यातच या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. पण केंद्राच्यावतीने त्याची दखल घेतली नसल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा उद्रेक शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक आंदोलन करून झाला.