नगर, (दि.30 डिसेंबर) : समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येवून काम केल्यामुळे समाजाची प्रगती होते. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सावेडी गांवठाण येथे मनपाच्या माध्यमातून बुध्द विहार बांधून एक प्रकारे शांततेचा संदेश देण्याचे काम केले आहे. यामाध्यमातून सर्व समाज एकत्र येवून आपल्या विचाराची देवाण घेवाण याठिकाणी केली जाईल. तसेच या बुध्द विहारमध्ये सांस्कृतीक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होईल. नगर शहराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून देवू नगर शहराला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दोन मजली सुसज्ज इमारत बांधून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
कोरोना संकट हळू हळू दूर होत असून देश पूर्वपदावर येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. नगर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआय पक्ष वाढविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे नगर शहराशी एक माझे नाते जोडले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सावेडी गांवठाण येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून सुसज्ज असे बुध्द विहारचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रविंद्र बारस्कर, राहुल कांबळे, उदय कराळे, विलासराव ताठे, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, किशोर वाकळे आदीसह
नितीन शेलार, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव, शिवा आढाव, शुभम वाकळे, अजय साळवे, दिपक मेढे, सदाशिव भिंगारदिवे, श्रीमती जयाताई गायकवाड, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, पप्पू भिंगारदिवे, शुभम भिंगारदिवे, बाळासाहेब जगताप, अरूण भिंगारदिवे, मिलींद भिंगारदिवे, बाबासाहेब भिंगारदिवे, राहुल भिंगारदिवे, पप्पू गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहराम ध्ये ठिकठिकाणी बुध्द विहार बांधण्याची संकल्पना आल्यामुळे हे बुध्द विहार उभे राहिले आहे.
अजूनही शहरामध्ये बुध्द विहार उभे करणार आहे. बुध्द विहारच्या माध्यमातून समाज जोडला जातो. विकास कामाबरोबरही नागरिकांना संघटीत करून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. लवकरच नगरामध्ये सामाजिक न्याय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा केला जाईल असे ते म्हणाले. यावेळी श्रीमती जयाताई गायकवाड म्हणाल्या की महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आमच्या वस्तीमध्ये एक बुध्द विहार बांधून दिले त्यामुळे या सभागृहात आम्हाला सामाजिक उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्द यांचे विचार या बुध्द विहार मधून आजच्या युवा पिढीला देण्याचे काम होणार आहे, असे त्या म्हणाल्या.