। मुंबई । दि.21 एप्रिल । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असताना राजधानी दिल्लीत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. दिल्लीतील कोरोनाचा वाढता आलेख बघता केंद्राने सतर्कतेची पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
दिल्लीतील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवत प्रतिबंधात्मक पावलं उचलायला सुरू करा, असा इशारा दिला आहे. या पत्रात मास्कस्ती व सोशल डिस्टन्सिंगचं पालन अनिवार्य असल्याचंही नमूद करण्यात आलं. त्यामुळे मास्क मुक्त झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना स्थिती व निर्बंधांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना प्रकणांची वाढ लक्षणीय नसल्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे सध्यातरी कोणतेही निर्बंध लादण्याची गरज नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून मास्कस्कती हटवण्यात आली आहे. दिल्लीतून समोर येणार्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. तर आम्ही सर्व प्रकरणांचे बारकाईने निरिक्षण करूनच योग्य निर्णय घेऊ, असंही राजेश टोपे म्हणाले.
Tags:
Maharashtra
