। अहमदनगर । दि.27 जानेवारी । रब्बी हंगामात खताची मागणी वाढलेली असतानाच शासनाने खताच्या किमतीत वाढ केल्यामुळे शेतकर्यांचे बजेट कोसळले आहे. निसर्गाच्या ऋतुमानात अचानक होणार्या बदलामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले असतानाच शासनाने खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खताची 24ः24ः0 ची गोणी 1540 रुपयांना मिळत होती, पण आता तिची किंमत 1700 रुपये झाली आहे. 10ः26ः26 ची गोणी 1450 रुपयांची गोणी 1640 रुपयांना तर 12ः32ः16 खताची गोणी 1470 रुपयांऐवजी 1640 रुपये झाली आहे. पोटॅशची किंमत पूर्वी 1015 रुपये होती, ती आता 1875 रुपये झाली आहे. 16ः20ः0ः13 या खताच्या गोणीतही 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. शासनाने खताच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. शेतकर्यांनी कांदा, गहु, हरभरा, ज्वारी पिके घेतली. अनेकांनी फळबागा धरलेल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे फवारणी करून वैतागलेल्या शेतकर्यांमध्ये खताच्या किमती वाढवल्याने अस्वस्थता आहे.
Tags:
Ahmednagar