पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीनेही सोडला प्राण

। अहमदनगर । दि.27 जानेवारी । नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे पतीचे निधन झाल्यानंतर पतीचा विरह सहन न झाल्याने अवघ्या काही तासातच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुका भाजपचे उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांचे वडील पाराजी शंकर दारकुंडे (वय 78) यांचे सोमवारी (दि. 24) रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आयुष्यभर संसाराचा गाडा चालवताना एकमेकांच्या साथीने व मोठ्या कष्टाने संसार फुलविला होता. सुमारे साठ वर्षे एकत्रित संसार करणार्‍या तसेच एकमेकांच्या सुख-दुःखात सदैव साथ देणार्‍या पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या पत्नी गयाबाई (वय 73) यांनीही दुपारी आपले प्राण सोडले.

पतीच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. एकाच दिवशी पती-पत्नीच्या मृत्यु झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जेऊर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post