कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घरपोहच मृत्यू दाखला देणार : महापौर बाबासाहेब वाकळे

। अहमदनगर  । दि.03 जून । अहमदनगर महानगरपालिकेने गेल्या दीड वर्षापासून जिल्हयात विविध उपक्रम राबवून कोरोना बांधितांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यातच आता कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घरपोहच मृत्यू दाखले देण्यात येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली आहे.

वाकळे पुढे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेने गेल्या दीड वर्षापासून कोरोना संकट काळामध्ये शहराच्या जबाबदारी बरोबर जिल्हयातील रूग्णांना मदतीच्या सहकार्याची भुमिका पार पाडली आहे. यामध्ये बुथ हॉस्पीटल येथे संपूर्ण जिल्हयातील रूग्ण उपचारासाठी दाखल होत होते. त्यांच्यावर होणारे उपचार मोफत होत होते. बुथ हॉस्पीटलने दिलेले 1 कोटी 90 लाख रूपयाचे बील मनपाने सुपूर्त केले.

याच बरोबर ग्रामीण भागातून मोठया संख्येने करोनाचे रूग्ण उपचार घेण्यासाठी नगर शहरामध्ये येत आहेत. दुदैवाने काही रूग्णांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीही मनपाने केला. याच बरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक भावनेतून आजुन एक पाऊल पुढे जावून मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाच्या वतीने मृत्यू दाखला मोफत घरपोहच देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.  सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, येत्या दोन ते चार दिवसात पोष्टाने किंवा हस्ते घरपोहच दाखला मिळेल असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कोरोनो आजाराने दुदैवी मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत व घरपोहच मृत्यू दाखला देण्याचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे व नातेवाईक उपस्थित होते.


यावेळी आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, कोरोना आजाराने दुदैवी मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना शासकीय व खाजगी कामासाठी मृत्यू दाखल्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी मनपाच्या वतीने मोफत व घरपोहच मृत्यु दाखला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कारण दाखला नेण्यासाठी नागरिक मनपामध्ये गर्दी करित आहेत. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा संसर्ग होवू नये यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post