आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारुने अंघोळ घालुन मनसेने केले अनोखे आंदोलन

। अहमदनगर  । दि.30 मे । कोरोना लॉकडाऊन काळात खासगी अस्थापना बंद असताना दारूची दुकाने मात्र सुरू आहेत. सरकारला दारू आवडते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूने अंघोळ घातली आहे. मनसेच्या वतीने नगरमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले.                                                                                                           

मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे यांनी सरकारच्या पुतळ्याला बियरची अंघोळ घातली. कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे व्यापार ठप्प झाले.

बाजारपेठ, दुकाने सर्व बंद करण्यात आले. सरकारच्या अशा जुलमी निर्णयामुळे लोकांकडे दारू घ्यायला सुद्धा पैसे राहिले नाहीत.  म्हणजे दारू प्यायची म्हटलं तरी लोकांना आता व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे, अशी परिस्थिती सरकारने सर्वसामान्यांवर आणून ठेवली आहे.

सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले. कापड दुकान, किराणा, मोबाईल दुकान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील कामगार पगार नसल्याने उपाशी आहेत. त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणा माल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची असा प्रकार सुरू आहे.

सर्वसामान्य दुकानदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारू विक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये दहा हाजार रिक्षावाले आहेत, त्यातील फक्त पाचशे रिक्षावाल्यांना सरकारी मदत मिळाली.

बँका, फायनान्स कंपनीचे हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. बँकांचे व्याज आणि वसुली सुरूच आहे. त्यामुळे सरकारने आता बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भुतारे यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post