पुणे-नगर शटल रेल्वेसेवेसाठी रेल्वेमंत्र्यांना गांधींचे साकडे!

। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्‍न असलेला पुणे-नगर शटल रेल्वेसेवा सुरू होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सदर रेल्वे सेवा एप्रिलपासून कार्यान्वीत करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. 

 

दरम्यान, या रेल्वेसाठी 13 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या रेल्वे रोको आंदोलनासाठी विविध संघटना ठाम असून, रेल्वेमंत्र्यांकडून लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते.


अहमदनगर-पुणे (व्हाया काष्टी, केडगाव) रेल्वे कॉड लाईनचे काम मागील पाच ते सहा वर्षापासून सुरू होते. ते काम पूर्ण झाले आहे. अहमदनगर व पुणे शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून सकाळ व संध्याकाळ ही शटल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आहे. दौंड रेल्वे स्टेशन बाहेरील कॉड लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, सदरील रेल्वे सेवा त्वरित सुरू करता येऊ शकते. 

 

कॉड लाईनचे काम मागच्या वर्षी पुर्ण झाले. मात्र, कोरोना महामारीमुळे ही रेल्वेसेवा सुरू होऊ शकलेली नाही. 1 एप्रिल पासून अहमदनगर-पुणे रेल्वे सेवा सुरू करुन नगरकरांना नवीन वर्षाची भेट द्यावी व याबाबतचे जनरल मॅनेजर मुंबई व डी.आर.एम. सोलापूर यांना आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे खासदार गांधी यांनी केली आहे.


नुकतेच अहमदनगर रेल्वे स्थानक येथे सदर रेल्वे सुरु करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स सोशल फाऊंडेशन संघटना सहभागी होणार आहेत. 

 

तर या आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, अ‍ॅड. कारभारी गवळी, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post