नगर, (दि.11 डिसेंबर) : जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करून न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, गणेश निमसे, दीपक गुगळे, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, शहानवाज शेख, अजय सोळंकी, संतोष उदमले, वसीम शेख, फारूख शेख, लक्ष्मण साळे, प्रशांत डहाळे, संतोष त्रिंबके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षांपासून जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत १७ सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी ७ महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले, तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्यांचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. पण कार्यालयीन हलगर्जीपणामुळे १ कोटी ३० लाख ७४ हजार एवढा निधी मागे गेला, असा आरोप जन आधार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
