बळीराजाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी प्रयत्न
शेतकर्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधत
पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिला संवेदनशीलतेचा प्रत्यय
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जाणार असलेल्या मार्गावर काही शेतकरी थांबले होते. त्यांना पाहताच पालकमंत्री मुश्रीफ यांनी वाहनांचा ताफा थांबवला. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी त्यांना नुकसान झालेली पीके दाखवली आणि राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा तीव्रतेने व्यक्त केली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी तितक्याच संयतपणे आणि संवेदनशीलतेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि शेतकर्यांची काळजी या सरकारला आहे, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन तुम्हाला मदत निश्चितपणे मिळेल. तुमची दिवाळी गोड होईल, असा शब्द दिला. त्यांच्या या दिलाशाचे या शेतकर्यांनीही उत्स्फूर्त स्वागत करुन साहेब, तुम्हीच हे करु शकता अशी प्रतिक्रिया दिली.
मुंगुसवाडे येथील हंगे कुटुंबातील दोन महिला पाण्यात बुडून मृत्यू पावल्या होत्या. त्या कुटुंबाचे सांत्वन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आणि त्यांना आधार देत तालुका प्रशासनाला मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
आपल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना मुश्रीफ यांना शेतकर्यांनी कापूस, मूग आदी पिकांचे खूपच नुकसान झाल्याचे आणि अजूनही पीके पाण्याखाली असल्याचे सांगितले. त्यावर थेट बांधावर जात तसेच अगदी शेतात जात त्यांनी शेतकर्यांकडून परिस्थिती जाणून घेतली.
पाहणी दौरा आटोपल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकार्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आठ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून हे काम वेळेत पूर्ण करुन अहवाल राज्य शासनाला सादर करु, असे सांगितले.
पावसामुळे अनेक ठिकाणी वीजेचे डीपी नादुरुस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरु्स्ती करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे ते म्हणाले.




