आदिक कुटुंबियांकडून मोफत धान्याचे वितरण


 श्रीरामपूर (दि.12) :  कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर शहरातील गोरगरीब, गरजू, हातावर पोट असणारे उपाशीपोटी राहू नये यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषक समाज व आदिक कुटुंबियांच्या वतीने ३२ क्विंटल गहू, तांदूळ व १६ क्विंटल हरभरा दाळीचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मजूर, गोरगरीबांवर बेरोजगारीची कुहाड कोसळली. हा लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढणार असल्याने असंख्य नागरिकांसमोर आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर शहरात कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी शहरातील गरजुंना नगरसेवकांच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी ३२ क्विंटल गहू व तांदूळ व १६ क्विंटल हरभरा डाळीचा समावेश आहे. शहरातील ३२ प्रभागातील नगरसेवक राजकारणविरहीत कोणताही भेदभाव न पाळता आपल्यापरीने गरीब, गरजू कुटुंबांना मदत करत आहेत. या मध्यमातून त्यांना हातभार लागावा म्हणून प्रत्येक नगरसेवकाला १०० किलो गहू, तांदूळ व ५० किलो हरभरा दाळ देण्यात येत आहे. या धान्यात नगरसेवक त्यांच्याकडील अन्नधान्याची भर घालून ते आपल्या प्रभागातील गरजुंना वितरीत करणार आहेत, असे नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या,

तसेच शहरातील ४६० दिव्यांगांना मास्क, सॅनिटायझर, टॉवेल व साबण असा किट वाटण्यात येणार आहे. दशमेशनगरला गुरूद्वार व सरस्वती कॉलनी येथील साईमंदिरात अन्नछत्र चालू असून त्यांनाही प्रत्येकी १०० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. रवींद्र जगधने, नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, रोहित शिंदे, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, डॉ. ऋतुजा जगधने आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post