नगर : कोरोना व्हायरसचे काही रुग्ण राज्यासह देशात आढळून आलेले आहे. शासकीय पातळीवरून देखील त्याचा गांभिर्याने विचार केला असून जागतिक आरोग्य संघटनेसह राज्य शासनाने देखील कोरोना व्हायरसपासून संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक खबदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
येत्या सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी नगरच्या जिल्हा परिदेतमध्ये होणार आहे. कर्मचारी संघटनेने बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एप्रिल महिनाअखेरीपर्यंत बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी ही माहिती दिली.
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा धसका सर्वांनीच घेतला आहे. देशासह राज्यातील नागरिकांनीही याचा चांगलाच धसका घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव जिल्ह्यातही पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. नगर जिल्हा परिषदेत कर्मचार्यांची हजेरी घेण्यासाठी सध्या बायोमेट्रिक प्रणाली वापरली जात आहे. सकाळी कामावर येताना व घरी जाताना दोन्ही वेळा बायोमेट्रिक प्रणाालीत कर्मचार्यांना हजेरी लावावी लागते. दिवसभरात शेकडो कर्मचार्यांची बोटं मशीनवर दाबली जातात. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आता बायोमेट्रिक हजेरी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Tags:
Ahmednagar
