। पुणे । दि.04 मे 2022। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली याचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. टिळकांनी शिव समाधीचा एक दगडही बसवला नसून त्यांनी शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी हडप केला.
तरीसुद्धा राज ठाकरे टिळकांनी समाधी बांधली असे खोटे सांगत आहेत. इतिहासाची मोडतोड करणाऱ्या ठाकरेंना इतिहास माफ करणार नाही. खोटे बोलून राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये इतिहासाचा खून केला, असे मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
कोकाटे म्हणाले, राज ठाकरे हे शिवप्रेमींच्या बाजूने नाही तर लेनवाद्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. राज ठाकरे हे उत्तम वक्ते असतानाही ते राजकीय जीवनात यशस्वी झालेले नाहीत. ठाकरे हे पुरंदरे यांचे जितके उद्दात्तीकरण करतील तितके ते तोंडावर आपटतील. आघाडी सरकारने पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा.
लेखक जेम्स लेनच्या पुस्तकाची पार्श्वभूमी पुरंदरे यांनी केली. बाबासाहेब पुरंदरे हे विकृतीचा परिपाक होते. त्यांनी शिवचरित्राबाबत जे विकृत लेखन केले त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पुरंदरे यांच्या जन्मापूर्वी ४० वर्षे अगोदर महात्मा फुले रायगडावर गेले. त्यांनी शिवसमाधीचा शोध घेतला आणि शिवजयंतीला सुरुवात केली.