आज अहमदनगर रेल्वे स्थानकाला १४३ वर्ष पूर्ण झाले आहेत.
जी. पी.आर - ग्रेटर पेनिन्सुला रेल्वे या अंतर्गत सुरू
झालेल्या रेल्वेचा प्रवास फारच छान आहे.
ऐतिहासिक अहमदनगर रेल्वे स्थानक
। हरजितसिंग देवेंद्रसिंग वधवा । दौण्ड-मनमाड हा 197 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 17 एप्रिल 1878 या दिवशी कार्यान्वित झाला. अहमदनगर या मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक ग्रेट इंडियन पेनिंनसुला रेल्वेतर्फे सन 1868 मध्ये व त्यानंतर 1876 मध्ये पी.डब्ल्यू.डी.तर्फे या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
माती भरावयाचे काम फेब्रुवारी 1877 मध्ये सुरू झाले. त्यावेळेस दुष्काळ असल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत या रेल्वे लाईनचे अर्धे काम अहमदनगर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यातील मजुरांनी पूर्ण केले. पेनीनसुला रेल्वेलाईन ही 5 फूट 6 इंचाची होती आणि तीच मनमाड ते दौण्डच्या दरम्यान करण्यात आली.
या मार्गावर 69 पूल आहेत. त्यात प्रमुख भीमा, गोदावरी, प्रवरा आणि मुळा या नद्यांवर पुल बांधण्यात आलेले आहेत. भीमा नदीचा पुल 535 यार्ड लांब आणि 28.5 फूट रुंद असून त्या वेळेस त्यासाठी 49 हजार 410 पौंड म्हणजे त्यावेळेचे 4 लाख 94 हजार 100 रुपये, गोदावरी पुल हा 21 फूट रुंद असून त्याच्यावर 41 हजार 230 पौंड (4 लाख 12 हजार 300 रुपये) तर प्रवरा नदीवरील पुल 280 यार्ड लांब व 18.4 फूट रुंद त्याकरिता खर्च 23 हजार पौंड (2 लाख 30 हजार रुपये). मुळा नदीवरील पुलाकरिता 147 फूटाचे गर्डर वापरण्यात आले आणि त्याकरिता 33 हजार 570 पौंड (3 लाख 35 हजार 700 रुपये) खर्च करण्यात आला.
मुळा नदीवरील पुल सोडल्यास बाकी सगळे पुलांचा पाया दगडावर आहे. परंतु मुळा नदीवरील पुलाकरिता वाळूमधील 30 फूट आणि त्याच्या खाली काळ्या मातीत 10 फुटांपर्यंत खोल खोदावे लागले होते. त्यावेळेस 10 अश्वशक्तीच्या 6 मोटर्स, दिवसरात्र सदरचा खड्डा कोरडा रहावा, यासाठी कार्यरत होत्या. वडार समाजाने त्या वेळेस बोल्डर ट्रॅप हे मोठे दगड आणून सगळ्या पुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या पूर्ण पट्ट्या 69 पुल असून त्यापैकी 26 मोठे पुल आहेत आणि बाकीचे लहान पुल आहेत.
लांबी 4 ते 6 फूट आणि सगळ्यांना आलेला खर्च 93 हजार पौंड (9 लाख 30 हजार रुपये). पूर्ण रेल्वे लाईनच्या कडेला तारेचे कुंपण टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु नगर आणि लाख या किनार्यावर बाभूळ लावण्यात आली. ज्या वेळेवर संपूर्ण लाईन पूर्ण झाली त्यावेळेस खर्च पूर्ण 13 लाख 50 हजार पौंड (एक कोटी 35 लाख रुपये) म्हणजे एका मैलाला अंदाजे 93 हजार 800 रुपये खर्च आला. यापैकी जागेसाठी फक्त एक लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आला आणि माती कामासाठी 10 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला.
17 एप्रिल 1878 मध्ये मनमाड ते दौंड ही रेल्वे लाईन कार्यान्वित होऊन प्रवासासाठी खुली करण्यात आली. 1880 पर्यंत सदर रेल्वे इंग्रज सरकारच्या अधिपत्याखाली होती. त्यानंतर पेनीनसुला रेल्वे अधिकार्यांकडे वर्ग करण्यात आली. दौण्ड-मनमाड ब्रॉडगेज रेल्वेलाईनवरील अहमदनगर हे सर्वात महत्वाचे स्टेशन आहे. त्याकाळी त्याला ‘व्यावसायिक’ महत्व होते. साखर आणि फळे नगरहून सोलापूर, दौंड आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. याशिवाय इंजिनिअरिंग स्पेअर पार्टस् नगर येथे तयार होवून पुणे, मुंबई व नागपूर येथे निर्यात होत होती. रेल्वेमुळे शहराचे महत्व अजून वाढले.
आजचे जे रेल्वे स्थानक आहे, ते त्याचकाळी बांधलेले आहे. दोन प्लॅटफॉर्म असलेले हे रेल्वे स्टेशन एक प्रवाशांसाठी तर दुसरे माल वाहतुकीसाठी आहे. त्यावेळी सुद्धा रेल्वे प्लेटफॉर्म लाईट, फॅन, टी-स्टॉल, बुक स्टॉल व बाके (बेंचेस) इ. सुविधा होती. त्यावेळी सुद्धा आजच्या प्रमाणे अप्पर क्लास, लोअर क्लास, महिला वेटींग रुम तसेच शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उपलब्ध होती. रेल्वेस्थानकाची इमारत ही चिरेबंदी दगडात बांधण्यात आली आहे. आणि उत्कृष्ट स्थानकात अहमदनगरच्या रेल्वे स्थानकाची गणना होते. आज अहमदनगर रेल्वे स्थानक जंक्शन झाले आहे आणि येत्या काळात दक्षिण भारताला उत्तर भारत व मुंबईला जोडणारा एक महत्वाचा दुआ म्हणून कार्यान्वित होणार, हे निश्चित.
- हरजितसिंग देवेंद्रसिंग वधवा (मो. 9423162727)