। मुंबई । दि.10 जून । सहकार्यांच्या कष्टानं राष्ट्रवादीने 22 वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे.
मविआ सरकार 5 वर्ष टिकणार, नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असं शरद पवारांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे.
ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
