महापौर निवडणुकीत भाजप अलिप्त राहणार! : खा.डॉ.सुजय विखे पाटील

। अहमदनगर । दि.30 मे । जून महिन्यामध्ये महापौर निवड होणार आहे. अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या यापदावर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावे केले आहेत. भाजपाचे 15 नगरसेवक असल्याने आता त्यांचा पाठीबा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, खासदार डॉ.सुजय विखे यांनी सांगितले की, महापौर निवडणूकीत भाजप अलिप्त राहणार आहे. यामुळे विविध तर्क वितर्काना उत आला आहे. तर दुसर्‍या बाजुला आता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या भुमीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपामध्ये भाजपाचा महापौर करण्याच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने साथ घेतली होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती मात्र, आता महाविकास आघाडी असल्याने नेमका काय निर्णय होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खा.विखे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेक तर्क वितर्क मांडले जात आहे.

मात्र आता भाजपने जर या निवडणुकीत माघार घेतली तर या निवडणुकीत मोठा घेडेबाजार होणार का ? असाच काहीसा प्रश्‍न नगरकरांना पडला आहे. भाजपचे नगरसेवक महापौर निवडणुकीत तटस्थ राहिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षीय बालाबल पाहिले तर  भाजपाचे 15 आहेत तर महापौरपदासाठी 27 जणांचे बहुमत महत्त्वाचे आहे. यामध्ये शिवसेना 23, राष्ट्रवादी 19, कॉग्रेसकडे 05, बहुजन समाज पक्षाकडे 04, समाजवादी पक्षाचे 01 असे बलाबल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post