राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज

।मुंबई । दि.27 एप्रिल । कोरोनाने राज्यभरात थैमान घातले आहे. मात्र, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे.

त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

परंतु, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे.

पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post