। मुंबई । दि.20 मार्च । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, असा प्रश्न विद्यार्थी पालकांमध्ये उपस्थित झाला होता. दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. दोन्ही लेखी परिक्षेसाठी अर्धा तास अधिक मिळणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
तसेच, दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरू असलेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत पत्रकार परिषद घेतली आहे. विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेसाठी साडे तीन तासांचा वेळ दिला आहे.
तर दिव्यांग विद्यार्थ्यांना 1 तास वाढवून दिला आहे. तसेच ठरलेल्या वेळापत्रकारनुसारच परीक्षा होणार असून लेखी परिक्षा ही ऑफलाईन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबत कोरोना प्रादुर्भावाची काळजी घेत वर्ग खोल्या कमी पडल्या तर बैठक व्यवस्था दुसरीकडे करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
