। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी । गिर्यारोहकांनी कळसूबाई शिखर सर करत, शिवचरणी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करीत, जय शिवाजी... जय भवानी..., हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत येथील अहिल्या शिवप्रेमी ट्रेकिंग परिवाराच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
येथील अभियंता श्रीरंग राहिंज, स्वाती ठाकूर, संतोष बनकर यांच्या नेतृत्वाखाली परिवाराच्या वतीने नवीन वर्षातील दीड महिन्यातील तिसरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या तिन्ही मोहिमेत मिळून 175 च्या वर सदस्यांनी भाग घेतला. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बारी या गावातून पहाटे 4 वाजता मोहिमेला सुरुवात झाली व 3.30 तासांची पायपीट करत शिखर सर केले.
रात्रीच्या अंधारात विजेरीचा उजेडात या मोहिमेचा खरा थरार लोखंडी शिड्यावरुन चढताना अनुभवला. शिवजयंती साहसी मोहिमेत अभियंता श्रीरंग राहिंज, गव्हर्न्मेंट ऑडिटर स्वाती ठाकूर, संतोष बनकर, प्रीती बलदोटा, शिंदे, जाधव आदी आबालवृद्धांनी सहभाग घेतला.
मोहिमेसाठी नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई या ठिकाणांहून गिर्यारोहक आल्याचे महिला प्रतिनिधी स्वाती ठाकूर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गड-किल्ले भ्रमंती व संवर्धनासाठी अभियंता श्रीरंग राहिंज (8888438755) संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
