। अहिल्यानगर । दि.10 जुन 2026 । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण, नोंदणी व ओळखपत्र वितरण अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सर्वेक्षण व नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित पंचायत समिती अथवा सर्वेक्षण पथकाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.
दि. २१ सप्टेंबर २०२१ व दि. ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयांतील तरतुदींनुसार लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी स्मार्ट सर्विसेस प्रा. लि., पुणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र, ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र तसेच रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी केल्यानंतर ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार असून त्यांना अधिकृत ओळखपत्र उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविणे अधिक सोपे होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक महेश आढाव यांच्याशी ९९२३१९५५२७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
