। नवी दिल्ली । दि.12 फेब्रुवारी । भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आता परदेशातही सुरू झालीय. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासहीत अनेक परदेशी सेलिब्रिटी आणि नामवंत मंडळींकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.
यापैंकी बहुतेक प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या शांतिपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आहेत. यामुळे, सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या हॅशटॅगचा ट्रेन्डही दिसून आलाय. यामुळे, केंद्रातील सरकारला मात्र चांगलाच झटका बसलाय. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय.
सोशल मीडियावर या प्रतिक्रियांची चर्चा भारतातही सुरू झाल्यानंतर मोदी सरकारकडून बुधवारी यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. हा प्रकार, ‘सनसनी फैलावणारे सोशल मीडिया हॅशटॅग’ आणि ‘कमेंटसची हाव’ असल्याचं सांगत केंद्रानं आंतरराष्ट्रीय नेटकऱ्यांना इशारा दिलाय.
