अवकाळी पाऊस सुरू झाल्याने या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू,पिकासह भाजीपाला पिकाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्याच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि विदर्भात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यभरात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत होता. नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळे शेतीला नुकसान होण्याची भीती देखील शेतकर्यांनी दर्शवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात तळकोकण ते विदर्भात भंडारा जिल्ह्यापर्यंत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, रायगड, भंडारा, यवतमाळ, बीड, वाशिम, सोलापूर, औरंगाबाद, गोंदिया, परभणी, अमरावती, बुलडाणा, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
