नगर, (दि.29 डिसेंबर) : महापालिकेच्या विद्युत विभागाला पूर्णवेळ अभियंता मिळावा तसेच, विद्युत साहित्य मिळावे, या मागणीसाठी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी आयुक्तांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरामध्ये गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विद्युत साहित्य मिळत नसल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
नगर शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे लोकवस्ती वाढत आहे. त्या भागात लाईटचे दिवे बसविणे नगरसेवकाचे कर्तव्य आहे. मनपाच्या खांबावरील दिवे बंद आहेत. नागरिक वारंवार नगरसेवकांना बंद दिवे सुरू करण्याचाी मागणी करत आहेत.
नागरिकांना कुठपर्यंत उडवाउडवीची उत्तरे द्यायची? मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचा फायदा घेवून चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.
वारंवार प्रशासनाला सांगूनही विद्युत साहित्य मिळत नाही. स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याची निविदा प्राप्त झाली आहे. परंतु,विद्युत विभागाला पूर्णवेळ अभियंता नसल्यामुळे निविदा उघडण्यास विलंब होत आहे. प्रशासनावर आयुक्त यांचा धाक नसल्यामुळे कोणीही विद्युत विभागाचा पदभार घेत नाही.
जोपर्यत विद्युत विभागप्रमुख व विद्युतसाहित्य मिळणार नाही तोपर्यंत आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरूच ठेवणार आहे, असे स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी सांगितले.यावेळी संजय ढोणे उपस्थित होते.