शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


कोल्हापूर,  (दि.23 नोव्हेंबर) :  शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर आज निगवे खालसा येथे पोलीसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. “अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.

 

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील,  खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

 

शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 6.30 च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात येत असताना, या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढण्यात आली होती. ठिक - ठिकाणी श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. 
 
 
यानंतर शहीद जवान संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी  अधिकारी, पदाधिकरी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी  आणि  हजारोंच्या  संख्येने  ग्रामस्थ  उपस्थित  होते.

Post a Comment

Previous Post Next Post