। अहमदनगर । दि.06 मे । नगर शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. आज शनिवारी (7 मे) वीज वितरण कंपनीद्वारे पाणी योजनेचा वीज पुरवठा सुमारे साडेसहा तास बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात मनपाद्वारेही पाणी योजना दुरुस्ती कामे केली जाणार आहे. मात्र, मुळा धरणातून साडे सहा तास पाणी उपसा बंद राहणार असल्याने नगर शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे.
दि.7 रोजी महावितरण कंपनीकडून महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी घेण्यात येणार्या शटडाउनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे मनपाने स्पष्ट केले आहे. वीज वितरण कंपनीकडून 33 के.व्ही. मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग-दुरुस्ती कामासाठी शनिवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. तसेच या शटडाऊन वेळेत अहमदनगर महापालिकेमार्फत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
यामुळे वीज पुरवठा बंद असलेल्या काळात मुळा नगर व विळद जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवार दि.7 रोजी सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
यामध्ये बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, निर्मलनगर, मुकंदनगर तसेच सारसनगर, बुरुडगावरोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसराचा समावेश आहे. या भागास पाणीपुरवठा रविवारी दि.8 मे रोजी करणेत येईल.
तसेच रविवार दि.8 रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चोक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको, स्टेशन रोड, विनायकनगर इत्यादी भागात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि. 9 रोजी करण्यात येईल. तर सोमवारी दि.9 रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या शहराच्या मध्यवती भागातील सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख़िस्तगल्ली इत्यादी भागात पाणीपुरवठा मंगळवा दि.10 रोजी करण्यात येणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. नागरिकांनी याची नोंद घेवून उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
Tags:
Breaking