। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे 28 प्रकरणांत 100 ते 150 कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राजेंद्र ताराचंद गांधी (वय 56, रा कोहिनूर गार्डन, माळीवाडा, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेचे सन 2014 ते 2019 या कालावधीतील तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य व नगर अर्बन बँकेचे अधिकारी जबाबदार पदावर कार्यरत होते.
त्यांनी 2015 ते आजपर्यत कर्ज प्रकरणांचे निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाच्या सभा घेऊन कर्ज मंजूर केले आहे. काही कर्जदार आणि इतर संबंधितांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, आर्थिक पत्रके आणि इतर कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारे माझ्यासह नगर अर्बन बँक, सभासद, खातेदार आणि ठेवीदार यांचे आर्थिक नुकसान करून 100 ते 150 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.
तसेच मंजूर कर्जाची रक्कम स्वत:च्या फायद्याकरिता वेगवेगळ्या खात्यांचा वापर करून काढून घेऊन वेगळ्या स्वरूपात वापरली आहे, असे फिर्यादीत नुमूद करण्यात आले आहे.
आरोपींमध्ये सन 2014 ते 2019 या कालावधीतील अर्बन बँकेचे चेअरमन माजी खासदार (कै.) दिलीप गांधी, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, आशुतोष सचिन लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी आणि बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत घनशाम बल्लाळ यांचा समावेश आहे.
Tags:
Breaking