नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक :जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

। अहमदनगर । दि.14 सप्टेंबर । जिल्हयात 31 ऑगस्ट, 2021 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सूचना संबंधीत विमा कंपनी (भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ली.) यांना 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विका संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

तथापिक विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमा धारक शेतक-यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insuranc हे ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 1800 1032 292 या टोल फ्री क्रमांकावर किंवा portalqueries.pmfby@bhartiaxa.com आणि   shushan@dhushan@bhartiaxa.com या ई-मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यामांव्दारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ली. किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post