। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर ट्रॅक्टर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकर्याचा व 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना वाडेगव्हाणमधील अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय 38 रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यास अटक करण्यात आली आहे.
या बाबतची माहीती अशी की गुरुवारी दि. 24 रोजी दुपारी जालिंदर दुलदगड हा वाडेगव्हाण शिवारातील शेतामध्ये छोटया ट्रॅक्टरने पेरणी करीत होता.
त्यावेळी पेरणी यंत्रावर तुकाराम भिमाजी तरडे (वय 48) व शुभम दत्तात्रेय तरडे (वय 13) हे बसलेले होते. पेरणी सुरू असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक जालिंदर याने अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो बांधावर घातला.बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रेय तरडे हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. दुर्घटनेनंतर परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुपे पोलिसांना त्याबाबतची माहीती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांनी पोलिस कर्मचायांसह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येउन अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी सुपा पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सुपा पोलिस करीत आहे.
