। अहमदनगर । दि.28 फेब्रुवारी । कोल्हेवाडी (ता.जामखेड) येथे मळणी यंत्राखाली पडलेले भुस्कट काढण्यासाठी खाली वाकलेल्या सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय -४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना २६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळण यंत्रावर काम करत होते. खळे संपत आले असताना मळण यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या वाकून भुसकट काढत होत्या.
त्यावेळी ट्रॅक्टर व मळण यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाप्टमध्ये सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला व शाप्टसोबत त्यांच्या शरीराचा भागही गुंतला. डोके ही मळणी यंत्रात अडकले काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधुबाई कोल्हे यांच्या मागे पती, दोन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे.