वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गावा पर्यंतच्या
रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी
तसेच निकृष्ट काम पुन्हा चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी
नगर, (दि.25 नोव्हेंबर) : नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गावा पर्यंतचा (बायपास) रस्त्याचे सहा महिन्यापुर्वी झालेले काम अत्यंत निकृष्ट झाले असून, सदर कामाची चौकशी करावी व झालेले निकृष्ट काम पुन्हा चांगल्या दर्जाचे करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, गौरव बोरकर, सुशील साळवे, मयुर रोकडे, हनुमंत कलापुरे, मच्छिंद्र गांगर्डे, संतोष त्रिंबके, शाहिद सय्यद, अमोल भंडारे, दीपक गुगळे, गणेश निमसे, अमित गांधी, अजय सोळंकी आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
नगर-सोलापूर रोड वरील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट पर्यंन्त रस्ता सहा महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या 10 किलोमीटर रोड साठी 2.5 कोटी आणि पुढील 8 किलोमीटर रोड साठी 1 कोटी असा 18 कि.मी. साठी तब्बल 3.5 कोटी निधी मंजूर झाला होता. डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी रोडच्या बाजूने अद्याप गटारीचे काम करण्यात आलेले नाही. या रोड च्या दरम्यान साधारण तीन पुल लागतात. या पुलावर कुठल्याही प्रकारचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही.
वाकोडी फाट्यावरून पुढे जात असताना लागणारा पहिला पूल हा पूर्णपणे खचला आहे. तरीही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतुक सुरु आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस कठडे देखील बसवलेले नाहीत. तसेच जीर्ण झालेल्या पुलामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याचा धोका आहे. सहा महिन्यात अर्ध्याच्यावर रोड अनेक ठिकाणी खराब झाला आहे. रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारास कोणत्या निकषावर बिल अदा करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याची पहाणी करुन दोषी ठेकेदाराची चौकशी करुन खराब झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. सदर काम चांगल्या दर्जाचे न झाल्यास अधिकार्यांच्या खुर्च्यांचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
