नगर (दि.24) : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून,उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यात उत्पादन खर्च भरून निघणे मुश्कील झाल्याने आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दर कोसळल्याने कांदा उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित झाला आहे. आवकेतही स्थिरता आली आहे, मात्र कांदा देशांतर्गत व परदेशात पाठविण्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट व गुंतागुंतीची झाली आहे.
हा सर्व नकारात्मक व प्रतिकूल परिणाम कोरोनामुळे झाल्याने व्यापारीवर्गही हतबल झाला आहे.कारण खरेदी केलेला कांदा जरी साठवणूक योग्य असला तरी सध्याचे वातावरण व भाविष्यातील व्यावसायिक अंदाज याचा ताळमेळ बसविताना अर्थचक्राचा अभ्यास व्यापारीवर्ग करत आहे. कारण माल खरेदी, साठवणूक, प्रतवारी विक्री, वाहतूकखर्च असे वर्तुळ पूर्ण होण्यासाठी आर्थिक नुकसान होऊ नये अशी भुमिका व्यापारी वर्गाची आहे.
