। अहिल्यानगर । दि.18 जानेवारी 2025 । अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, "दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अकोळनेर येथे प्रतीक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, "पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे." असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.
साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार
डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, "नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल", असे स्पष्ट केले.