। मुंबई । दि.04 जून 2022 । मागील काही महिने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाने मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढल्याने नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय घेतला आहे. मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी मास्क सक्ती नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला पत्र पाठवून उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात टास्कफोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात यावे असे ठरले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रेल्वे, बस, सिनेमागृह, शाळा, कॉलेज यांसारख्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. खुल्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक नाही.
ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नाही अशांनी त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन टोपे यांनी केले. त्याचप्रमाणे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्यांनी बुस्टर डोस घेण्यास हरकत नसल्याचे ते म्हणाले. तसेच कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्याच्या सूचना सर्व महानगरपालिकांना देण्यात आल्या आहेत.
Tags:
Breaking