पर्यटनातून जपले सामाजिक भान

पर्यटनातून जपले सामाजिक भान

ट्रेकॅम्पचा ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ उपक्रम 

400 ट्रेकर्सने राबविली आनंददरीत स्वच्छता मोहीम


। अहमदनगर । दि.15 जुन । आपल्याला भरभरून देणार्‍या निसर्गाप्रती प्रत्येकाने कृतज्ञ राहायला हवे. त्यासाठी सभोवतालच्या निसर्गाची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, या भावनेतून ट्रेकॅम्प संस्थेने ट्रेकिंग करतानाच डोंगरगण येथील आनंददरीत स्वच्छता मोहीम राबविली. सुमारे 400 ट्रेकर्सनी आनंददरीतील प्लॅस्टीक, काचेचा कचरा गोळा करून सामाजिक भान जपले.

नगरजवळ अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटनाला आल्यानंतर काहीजण प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या आदी कचरा तेथेच टाकून जातात. हा कचरा निसर्गाला घातक ठरत असल्यामुळे ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली कोअर टिमने बैठक घेऊन ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार निसर्गात भटकंती करत असताना डोळ्यासमोर दिसेल तो प्लॅस्टिकचा कचरा, बाटल्या गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे ठरले. या निर्णयाला ग्रुपच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

ट्रेकॅम्पने नुकत्याच आयोजिलेल्या आनंददरी ट्रेकमध्ये 400 पेक्षा अधिक अबालवृद्ध ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्या प्रत्येकाला हातमोजे देण्यात आले. वांबोरी घाटाच्या पायथ्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. डोंगरगणच्या आनंददरीतून फिरत असताना अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या डिशेस, पाणी-दारूच्या बाटल्या ट्रेकर्सनी गोळा केल्या. कचर्‍याच्या सुमारे 50 बॅग व दारूच्या 50 किलो बाटल्या गोळा झाल्या. त्या सर्वांची नगरमध्ये आणून ट्रेकर्सनी विल्हेवाट लावली. निसर्गात मनमुराद भटकंती करत असतानाच स्वच्छता मोहीम राबविल्याचा आनंद प्रत्येक ट्रेकर्सच्या चेहर्‍यावर दिसत होता.

नगरजवळील दुर्लक्षित निसर्गरम्य ठिकाणांचा शोध घेऊन तेथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यासाठी ‘साद गर्भगिरीला’ हा उपक्रम 4 वर्षांपूर्वी ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांनी सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केला. त्यास नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. तेथे गेल्यानंतर कोणताही सदस्य तेथे कचरा होणार नाही याची दक्षता घेतो. भेळीसाठी लागणार्‍या डिश, कॉफीचे कप हा सर्व कचरा गोण्यांमध्ये भरून नगरमध्ये आणून त्याची विल्हेवाट लावली जाते.

निसर्ग स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. पर्यटनाला जाताना तेथे कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वापर झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र गोणी अथवा पिशवी सोबत न्यावी. पर्यावरणाप्रती प्रत्येकाने सजग राहावे.
- विशाल लाहोटी, संस्थापक, ट्रेकॅम्प

Post a Comment

Previous Post Next Post