वारसा हक्काने कर्मचार्यांना मनपा सेवेत सामावून घेण्यात यावे
शिवसेना शिष्टमंडळाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
। अहमदनगर । दि.29 मे 2022 । मनपामध्ये काम करत असलेल्या कर्मचार्यांसच्या वारसांना मनपा सेवेत सामावून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. या कर्मचार्यांना मनपात सामावून घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना देऊन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक मदन आढाव, योगीराज गाडे, आकाश कातोरे, अभिषेक भोसले आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तात्कालीन नगर परिषद असतांना 51/1979 ऍवॉर्ड तरतुदीनुसार वारस हक्क नोकरी मिळणेकरीता अर्ज केला होता. तथापी सदरचा नोकरीचा वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल होते. सदर रिट पिटीशनचा निकाल दि.22 मार्च रोजी झालेला आहे.
सदरचा निकाल झाल्यानंतर आम्ही 4 एप्रिल रोजी आयुक्त कार्यालयास अर्ज देऊन उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे मुदतीत म्हणजेच 30 एप्रिल पावेतो कार्यवाही करणेबाबत विनंती अर्ज केलेला होता. सदरचे अर्जाप्रमाणे कोणतीही उचित, योग्य कार्यवाही न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पुन्हा आयुक्त कार्यालयास दि.11 रोजी पुन्हा देऊन उच्च न्यायालयाने आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत विनंती केलेली होती व आहे.
तथापी उच्च न्यायालयाचे आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे तसेच आम्ही वेळोवेळी दिलेल्या अर्जाचा विचार वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून आमच्या अर्जाचा विचार केलेला नाही तरी आपण योग्य निर्णय करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.