शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा येणार नाही म्हणत जीवनयात्रा संपवली


। पंढरपूर । दि.04 मार्च । पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी परिसरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरज जाधव या तरुण शेतकर्‍याने सरकारच्या शेतीविरोधी धोरणांना कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या तरुण शेतकर्‍याचे नांव सूरज जाधव असं असून सूरज याने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

सुरज यांनी विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओत ‘शेतकर्‍यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही’ असं म्हणत सरकारला दोष देत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करताना सुरज यानी एक व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता.

हा व्हिडीओ शूट करताना सुरजने म्हटलं, आपलं आयुष्य इथपर्यंतच होते. आपण शेतकर्‍याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही. हे सरकार शेतकर्‍यांचा विचार करणार नाही. पंढरपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

परंतू या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सूरज जाधव हा अल्पभूधारक शेतकरी होता. शेतीतून मिळणारं उत्पादन कमी व्हायला लागल्यानंतर त्याने जोडधंदा म्हणून गोपालन सुरु केलं.

सूरजने भांडवल उभं करुन 35 ते 40 गाई घेत दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतू दुधाचे दर सतत वरखाली होत राहणं, गाईंच्या खाद्याचा खर्च, सरकारची धोरणं याचा ताळमेळ सूरजला लागत नव्हता.

यातून आलेल्या नैराश्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मगरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सूरजच्या आत्महत्येनंतर मगरवाडी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

सूरजला आत्महत्या का करावी लागली याचा विचार सरकारने करुन यावर पावलं उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

असे कुठलेही पाऊल उचलू नका : राजू शेट्टी
या आत्महत्येनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, अतिशय विदारक आणि दुर्दैवी ही घटना आहे. शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न घेऊन मी कोल्हापुरात आंदोलनाला बसलो आहे. मात्र, पण या मुर्दाड राजकारणार्‍यांना जाग येत नाही. मी महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो असे कुठलेही पाऊल तुम्ही उचलू नका, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post