खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी; आंदोलनाचा इशारा

। अहमदनगर । दि.19 मे ।  इंधन दरवाढ, नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस, कोरोनाच्या संकटाने शेतकरी त्रस्त झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात आता ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढवून शेतकर्‍यांची सरकारने आर्थिक कोंडीच केली आहे. 



खताचे दर कमी केले नाही तर शेती करणे अवघड होईल. शेतकर्‍यांची सध्याची स्थिती पाहून तातडीने खताच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केंद्र सरकारकडे निवेदन देऊन केली आहे. खताच्या किमती झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



दहातोंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशात आणि राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणीशी सामना करत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 



त्यात सातत्याने अवकाळी पाऊस, विविध रोगांचा शेतीवर परिणाम, शेतीमालाचे पडलेले दर आणि कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने शेतीमाल, भाजीपाला, फळे विक्रीचा प्रश्न तयार झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात आता खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 



एकतर गेल्या महिनाभरात इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीच्या पूर्वमशागतीचा खर्च वाढला आहे. त्यात खताच्या वाढत्या किमतीची भर पडली आहे. शेतमालाला दर नाही, मात्र खताच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात मोठ वाढ होणार असल्याने सरकारने खताच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी कराव्यात व शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी थांबवावी. खताच्या किमती कमी केल्या नाही तर शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post