नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे सर

नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे सर.

सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे सरांचं दुःखद निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आदरणीय गुरुवर्य प्राचार्य रा.रं. बोराडे सर यांचा माझा पहिला परिचय मी देवगिरी महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना झाला. बोराडे सर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. अतिशय शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून त्यांचा नावलौकिक होता. माझे ऐच्छिक मराठी असल्यामुळे आणि सरांचा विषय मराठी असल्यामुळे सातत्याने सरांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. तेव्हा सरांची गाजलेली कादंबरी "पाचोळा" ही अभ्यासक्रमात होती. 

 


त्याचबरोबर अनेक कथासंग्रह आणि अनेक कथा सरांच्या अभ्यासक्रमात होत्या. सरांचे साहित्य वाचल्यानंतर सरांविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. सरांनी अतिशय दर्जेदार साहित्य निर्माण करून मराठी साहित्यात फार मोठे योगदान दिले आहे. सर एक चालते बोलतो विद्यापीठ होते. सरांनी केवळ साहित्य निर्मितीच केली नाही तर नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. 

त्यासाठी त्यांनी शिवार प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि त्या माध्यमातून लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला व बाल साहित्यिकांना सरांनी अनेकांना शिवार प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शिवार पुरस्कार देऊन गौरवले. त्याचबरोबर त्या काळात माझ्यासारख्या नव साहित्यिकाला सरांनी प्रचंड प्रोत्साहन दिले. पाठबळ दिलं. प्रेरणा दिली. आणि सातत्याने विचारपूस करून लिखाणासाठी उद्युक्त केले. 

त्याचबरोबर मला शिवार प्रतिष्ठानचे सदस्य करून छोटी मोठी जबाबदारी सातत्याने दिली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने २००५ ला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे साहित्य संमेलन सुरू केले. देवगिरी महाविद्यालय येथे पहिल्या साहित्य संमेलनाचे प्राचार्य रा. रं.बोराडे सर उद्घाटक होते. त्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी संस्थाचालकांनी साहित्यिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना जीव लावला पाहिजे. आणि त्यांना मदत केली पाहिजे. अशा पद्धतीचा भावना व्यक्त केल्या. 

त्याचबरोबर अशा प्रकारची संमेलने ही सातत्याने झाली पाहिजे.असा आशावाद  व्यक्त केला. दर्जेदार साहित्य निर्मिती झाली पाहिजे. मराठी साहित्यात मोलाची भर पडली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका सरांची होती. सरांनी अनेक संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने भूषवली व अनेक नामांकित पुरस्कारही सरांना मिळाले. परंतू मी कोणत्याही संमेलनासाठी व पुरस्कारासाठी अर्ज करणार नाही. 

दिले तर सन्मानन द्या. अन्यथा नको. म्हणून कदाचित बोराडे सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाही. एका दर्जेदार साहित्यिकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्षपद न मिळाल्याची खंत साहित्य वर्तुळात आहे. सर अगदी जोपर्यंत शक्य होतं.तोपर्यंत त्यांच वाचन, लेखन सुरू होतं. सातत्याने ते विविध विषयावर चर्चा करत असत. आणि भेटल्यानंतर विचारत असत. सध्या काय वाचतोस. आणि काय लिहितोस. लिहिणं थांबवू नकोस. 

असा उपदेश ते करत असत. परंतु काही दिवसापासून ते आजारी असल्यामुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकत नव्हता. आता तर ते आपल्यात नाहीत. मराठी साहित्य विश्वात ते गेल्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी सहजासहजी भरून निघणार नाही. त्यांनी दिलेला उपदेश, मार्गदर्शन याची अंमलबजावणी आपण सर्वांनी करावी हीच त्यांना आदरांजली असेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post