केंद्र सरकारने इंधन व खतांची केलेली दरवाढ तातडीने कमी करावी : राष्ट्रवादीची मागणी

। अहमदनगर । दि.18 मे । नुकत्याच केंद्र सरकारने केलेल्या खत व इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) दरवाढी निषेधार्थ नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आले व केंद्र सरकारने इंधन व खतांची केलेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.



यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, किसनराव लोटके, अशोकराव बाबर, केशवराव बेरड, सीताराम काकडे, सुहास कासार, गहिनीनाथ दरेकर, गजेंद्र भांडवलकर, वैभव मस्के, अक्षय भिंगारदिवे, आरिफ पटेल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




यावेळी जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले कि, देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीशी सामना करत असताना दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार वारंवार महागाईमध्ये वाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करण्याचे काम करत आहे. 



भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले असताना केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. 10.26.26 ची किंमती 600 रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे.

जो डिएपी 1185 रुपयाला होता,  तो आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 चे पन्नास किलोंचे पोते 1175 रुपयांचे होते ते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटँशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.



पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीमुळे महागाई वाढतच चाललेले आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असताना देखील केंद्र सरकार यावर कोणतेही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.म्हणूनच केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध व निदर्शने करण्यात येत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



केंद्रसरकारने तातडीने इंधन व खतांची झालेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या सात दिवसात जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष फाळके यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post