महात्मा फुले यांनी इंग्रज काळात शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व केले : अ‍ॅड.अमीन धाराणी

। अहमदनगर । दि.13 एप्रिल । सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी राजवटीत महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची धग आजही कायम आहे. किंबहुना सद्यस्थितीत शेतकरी आत्महत्यांनी या प्रश्‍नाचे गांभिर्य अधिक वाढविले आहे. महात्मा फुले यांनी इंग्रज काळात शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व केेले होते. ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘गुलामगिरी’ पुस्तकांतून त्यांनी सरकार, नोकरशाही, सामाजिक वर्ग यांचा शेतकर्‍यांप्रती असलेल्या दृष्टीकोनावर प्रखर हल्ला चढविला होता. 

 

शेतकर्‍यांना बिनव्याजी पतपुरवठा, करसवलत, सिंचनासाठी व्यवस्था, बाजार व्यवस्थेत संरक्षण, कृषी शिक्षणाची आवश्यकता आदि विषय पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरकार, नोकरशाही, सावकारी आणि बाजार व्यवस्थेत शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्याचे मुद्दे वारंवार उपस्थित केले होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. अमीन धाराणी यांनी केले.

 

 
मखदुम सोसायटी च्या वतीने गोविंदपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त तयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संगीत प्रेमी 
अ‍ॅड.अमीन धाराणी, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, अ‍ॅड.गुलशन धाराणी, शौकत विराणी उपस्थित होते.

 

 
पुढे बोलताना अमीन धाराणी म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक, समाज हितचिंतक श्रेष्ठ कृतिशिल असे होते. समाजातील विषमता, जाती भेद, वर्ण, द्वेष, गुलाम गिरी या कर्मठ प्रवृत्तीशी त्यांनी लढा दिला. दिनदुबळ्याचा विकास हा शिक्षणा शिवाय होणार नाही. हे त्यांनी ओळखले होते. स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. स्वत:ची पत्नी सावित्रीबाईंना शिकवुन त्यांना शिक्षिका केले. 

 

1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. तसेच बाल विवाह, सती प्रथा, भु्रणहत्या या सामाजात रुढ होत्या. या नष्ट करण्यासाठी त्यांनी सामाजाचे प्रबोधन केले. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. जगाला मानवता धर्म सांगितला. मानवाची सेवा व स्वातंत्र्याचे रक्षण हिच खरी ईश्‍वर सेवा आहे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार साहिल धाराणी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post