। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन १५ हजार देण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी मंगळवारी उपोषण केले.
उपोषणात सुनिता वाणी व सोनू तिरमारे,निवृत्ती गायकवाड, इमरान शहा, नारायण मोटे, राकेश चिमनकर, यशवंत पोटे, विकास शिंदे, प्रविण वाघ, रामचंद्र मरकड, वैशाली देशमुख, गीता भोसले, कल्पना भुसारे आदींसह जिल्ह्यातील व राज्यातील संगणक परिचालकांनी उपोषणात सहभाग नोंदवला.
सन २०११ सालापासून संगणक परिचालक कार्यरत आहेत. संगणक परिचालकांना अत्यंत तटपुंजे मानधन आहे. ते देखील वेळेवर मिळत नाही. कंपनीच्या ठेकेदाराकडून कायमच पिळवणूक होत असते. ग्रामपंचायतीकडून ठेकेदार एक रकमी चेक घेतात, मात्र त्यातील पूर्ण रक्कम संगणक परिचालकांना मिळत नसल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. हा प्रकार अकरा वर्षापासून सुरू आहे. ही बाब शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी देखील शासनाकडून या प्रश्नी संगणक परिचालकांना न्याय मिळालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.