पाण्यावर कधीच राजकारण केले नाही अन् करणार नाही : आ.पवार


जामखेड पाणीपुरवठा योजनेला १०७ कोटींचा निधी

जामखेड : जामखेड पाणी पुरवठा योजनेबाबत काही लोकांनी त्याचे अनेकवेळा राजकारण करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्वत: मान्यता मिळाल्याचे पत्र दाखवून जनतेची दिशाभूल केली. जामखेड शहराच्या जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे होते. या प्रश्नावर मी कधी राजकारण केले नाही आणि करणारही नाही उलट गरज होत. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. तीन महिने कटाक्षाने पाठपुरावा करत अखेर प्र.मा.मिळवून योजनेला निधी टाकून घेतला असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

जामखेडच्या पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने अखेर जामखेडच्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यात आमदार रोहित पवारांना यश आले आहे. प्रत्यक्षात या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व या योजनेसाठी संबंधित विभागाचे अधिकारी, मंत्री आदींचा कागदोपत्री वेळोवेळी पाठपुरावा करून आमदार पवार यांनी या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात जामखेडकरांना दिलेल्या शब्दाची खऱ्या अर्थाने वचनपूर्ती झाली असुन पुढील काही दिवसातच या कामास सुरुवात होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले. यामुळेच महिला, शाळकरी विद्यार्थिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार आहे. पाण्यासाठी दूरवर भटकंती करणाऱ्या जामखेड शहराच्या हक्काच्या पाण्यावर यापुढे कसलेही राजकारण होणार नाही अशी भावनिक प्रतिक्रियाही आमदार पवार यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post