बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

बर्ड फ्लूच्या अफवेने कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे नुकसान

। अहमदनगर । दि.15 जानेवारी । बर्ड फ्लूच्या भितीने गैरसमज व अफवा पसरुन नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना बर्ड फ्लू व मानवी आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी अंडी व कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून, चुकीच्या गोष्टी व अफवाला बळी न पडण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. देविदास शेळके, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके, संतोष कानडे, दीपक गोळक, डॉ.उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांनी माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करताना म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात 52 पक्षी मरण पावले असून, ते बर्ड फ्लूने मेले हे अजून निष्पन्न झाले नाही. यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिडसांगवी  गावाला कंट्रोल झोन म्हणून घोषित केला आहे व इतर भाग अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे. पक्षी मृत होत असतील तर त्या भागातील पक्ष्यांची वाहतुक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. 

2006 सालापासून हा बर्ड फ्लू आला. या संदर्भात शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली असता मनुष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले नाही. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसून, यापासून धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोनानंतर बर्ड फ्लूचे संकट महाराष्ट्रात आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरल्याने नागरिकांनी कोंबड्याचे मास व अंडी खाने बंद केले आहे. यामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

सन 2006 मध्ये महाराष्ट्र राज्यातील नवापूर (नंदुरबार) व जळगाव जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी अनेक कुक्कटपालन करणार्‍या व्यक्तींना बर्ड फ्लूची लागण झालेली नव्हती. ज्यांनी पक्षी मारण्याचे काम केले त्यांच्यात देखील ती लक्षणे आढळली नाही. भारतात एकाही व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याची नोंद नाही. यावरून बर्ड फ्लू व मानवी आरोग्याचा कोणताही संबंध दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

कोंबडीचे मास व अंडी खाणे कोणत्याही प्रकारे धोकादायक नसून, समाजमाध्यांच्या चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असल्याचे अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवणार्‍यांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post